गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

२. त्याच तिकिटात फुकट

सनोबरचे वडील निर्धास्त होऊन झोपले. परत आमच्या गप्पा रंगात आल्या. तेवढ्यात 'खान-पान' सेवा सुरु झाली. मी चविष्ट चिकन बिर्याणी व फिरनीवर ताव मारला, तर आनंदने फिश आणि भाताचा आस्वाद घेतला.  सोबत चहा, कॉफी, व ज्यूस होतेच.

चटपटीतपणे खाणे वाटताना होणारी हवाई सुंदरीची लगबग मला फारच आवडते.  काही  विमानप्रवासांत आधीच मेनू कार्ड देतात,  ते मला फारसे रुचत नाही. त्यामुळे, 'आता काय खायला मिळणार?' हा 'surprise element ' चा आनंद निघून जातो. काही low cost airlines च्या विमानांमधले  खाणे फुकट नसून , विकत घ्यावे लागते.  यामध्ये  'स्वस्त तिकीटाचा' आनंद मिळत असला तरी, त्याच तिकिटात 'फुकट' जेवण मिळणार नाही, याची हलकीशी खंत मला वाटते ! पण हवाई सुंदरीची लगबग बघायला मिळणार नाही, याचे दुःख, त्याहीपेक्षा जास्त असते. सौदी airlines चे तिकीट इतर कंपन्यांच्या तिकीटांपेक्षा  ४०-५० हजारांने स्वस्त तर होतेच आणि वर खाणे -पिणेही  'फुकट'  होते.  मात्र, त्यांच्या नियमाप्रमाणे, मदिरापान वर्ज्य असल्यामुळे इथे मदिराक्षी मदिरा पाजणार नव्हत्या.

विमानांत झोप काढणे किंवा सिनेमे बघण्यापेक्षा,  इकडे-तिकडे बघणे आणि जमल्यास कुणाशीतरी गप्पा मारणे मला जास्त आवडते. कुणी अबोल किंवा अती औपचारिकता पाळणारा शेजारी मिळाला, की माझी मनोमन चिडचिड होते. मुंबई ते जेद्दा हा पाच तासाचा प्रवास, सनोबरशी गप्पा आणि  हवाई सुंदऱ्या, सहप्रवासी,  आणि बाहेरची  विहंगम दृश्ये बघण्यात मजेत झाला. जेवणानंतर मी पाय मोकळे करायला उठले. सौदी airlines च्या विमानांत नमाझ पढण्यासाठी, मागच्या बाजूला साधारण ८ x १० फुटाची जागा असते. तिथे काही धार्मिक पुस्तके ठेवलेली होती आणि काही प्रवासी नमाझ पढत होते. पण विमानप्रवासांत , कुठल्या देशाची वेळ पाहून आणि कुठल्या दिशेकडे तोंड करून हे  नमाझ पढतात ? हा प्रश्न मला पडला.  मग, नादिया नावाच्या, काश्मिरी हवाई सुंदरीने शंकानिरसन केले. तिचे बरेचसे काम झालले असल्यामुळे तीही गप्पा मारायला उत्सुक होती. आम्हाला जेद्दाला १५ तास थांबावे लागणार आहे, हे मी बोलण्याच्या ओघात बोलून गेले.  नादिया काळजीत पडली.  मी नको नको म्हणत असताना मोठ्या आपुलकीने  तिने आमच्या बरोबर सहा सात मोट्ठे sandwiches, दीड लिटर पाण्याची बाटली आणि दोन सफरचंदे बांधून दिलीच!

जेद्दा जवळ आल्यावर , पवित्र क्षेत्रात पोहोचल्याची घोषणा झाली. बऱ्याच मुस्लिम यात्रेकरूंनी  धार्मिक पुस्तकांचे वाचन चालू केले. प्रथमच उमराहला येणाऱ्या मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यांवर व्याकुळता मला दिसू लागली.  ते पाहून, माझे मन  नकळत तीस वर्षे मागे गेले. आम्ही पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो तेंव्हा तासनतास भल्या मोठ्ठ्या रांगेत उभ्या असलेल्या खेडूतांच्या चेहऱ्यावर, असाच  'भेटी लागी जीवा लागलीसे आस' हा व्याकूळ भाव होता . धर्म कुठलाही असो, भक्तांच्या चेहऱ्यावर भाव एकच असतो, हेच खरे!

जेद्दाला पोहोचल्यावर लोकांची उतरण्याची गडबड सुरु झाली. काही बड्या घरच्या कार्ट्यांनी सवयीने आपापल्या हातातले अद्ययावत mobiles, tablets, I-pads चालू केली.  त्यांचे गलेलठ्ठ आईवडील आपापले महागडे cabin luggage उतरवू लागले. दुसरीकडे फाटक्या अंगयष्टीचे गरीब कामगार आणि  मुस्लिम यात्रेकरू, पूर्णपणे बावचळलेले होते. अशाच एका तरुणाने आनंदला "जेद्दा आले का? आता उतरायचे का?" असा भाबडा प्रश्न केला. तर एक वयस्कर गरीब प्रवासी, इथे  सगळेच फुकट असते अशा समजुतीने , विमानात वापरायला दिलेले  blanket आपल्या बरोबर घेऊन निघाला. मग हवाई सुंदरीने सौम्य शब्दांत त्याला ते परत  मागितले. पण आसपासचे एक दोन सराईत प्रवासी कुत्सितपणे हसल्यामुळे तो कमालीचा ओशाळला आणि मला फार वाईट वाटले .

गम्मत बघा , 'फुकट' गोष्टींचे सुप्त आकर्षण आपल्यासारख्या सुस्थितीतल्या लोकांनाही असतेच आणि एखादी गोष्ट सहज फुकट मिळाली की आपल्यालाही आनंद होतोच.  फक्त झालेला आनंद आपण उघडपणे दाखवत नसल्यामुळे आणि कुठे, केंव्हा आणि काय फुकट मिळू शकते याची थोडीफार जाण असल्यामुळे, आपले ते आकर्षण आणि तो आनंद  इतरांच्या डोळ्यावर येत नाही इतकेच !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा